Thursday, October 15, 2020

कोरोनामुक्त होण्यासाठी,सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी हात धुवा - सुशीलकुमार पांचाळ

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी: फतेहअलीखान पठाण

वाचन प्रेरणा दिनानिमित्त कानेगावच्या कोविड कॅप्टननी घेतला  वाचनाचा सराव
      सध्या कोरोनासारख्या भीषण महामारीतून स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे व आपले आरोग्य चांगले आणि निरोगी जगायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात हातांच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी कारण बहुतांश वेळा रोगांच्या आजाराचे जंतू हातातूनच पोटात जातात, त्यामुळे रोगजंतू पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता असल्याचे मत कानेगाव येथील राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ यांनी जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्याकडून हात धुण्याच्या पायऱ्यांचे प्रात्यक्षिक करून घेताना व्यक्त केले.कोरोना परिस्थितीतही त्यांनी आपले सहकारी प्रशांत जाधव यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगितले. हात स्वच्छ धुतल्यामुळे शरीर निरोगी राहते याच प्रेरणेतून जागतिक स्तरावर हात शुद्धीकरणाची मोहीम सुरु झाली .पाणी आणि आहार आपण तोंडाद्वारेच पोटात घेतो ते हात स्वच्छ असणे ही पहिली पायरी मानली जाते.यासाठीच १५ ऑक्‍टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाताच्या स्वच्छतेचे बीज रुजवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे ,कारण लहान मुलांमध्ये मुळात स्वच्छतेबाबत जागरूकता नसते. मातीतले खेळ, भटकणे ,अस्वच्छतेची जाण असणे, यामुळे मुलांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यातूनच बहुतांश शाळकरी मुलांमध्ये हागवण यासारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणात होताना दिसत आहेत. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना या निमित्ताने प्रेरणा दिली जाते. स्वयंपाकाची तयारी करण्याआधी, जेवायला बसण्यापूर्वी आणि जेवण झाल्यावर ,जेवायला वाढण्यापूर्वी ,शौचालयात जाऊन आल्यावर ,मुलांचे लंगोट व कपडे बदलल्यावर ,कोणत्याही रुग्ण किंवा आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर, खोकला सर्दी झाल्यावर नाक स्वच्छ केल्यानंतर, प्राण्याला हात लावल्यानंतर ,केरकचरा काढल्यावर, बाहेरून आल्यावर, वाहनातून प्रवास केल्यावर ,पैसे मोजल्यानंतर व केस विचारल्यानंतर आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे.  जाणीवपूर्वक वरील सर्व वेळी आपण हात धुतलेच पाहिजेत व 'थांबा ,आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुतले का ? असा प्रश्न प्रत्येक वेळी स्वतःला विचारणे गरजेचे आहे कारण 'स्वच्छ हातांमध्ये दम आहे' याचीही सवय लावून घेतली पाहिजे अशी शिकवण पांचाळ व जाधव गुरुजींनी दिली.माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेत प्रतिमेस हार घालून औपचारिक अभिवादन करण्यात आले.नंतर कोविड कॅप्टनच्या अभ्यासवर्गात वाचन प्रेरणा दिनानिमित्त सलग दोन तास वाचनाचा सराव घेण्यात आला व कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून जीवनात वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.