गंगाखेड़ तालुका प्रतिनिधी शफीक तंबोली : चार जिल्ह्यातील प्रवाशांकरीता सोयीची ठरणार्या नांदेड-पुणे पनवेल विशेष एक्सप्रेस सुरु करण्याबाबत दक्षिण मध्य रेल्वे विभागातल्या वरिष्ठ अधिकार्यांनी पुन्हा अर्थपूर्ण असे मौन बाळगले असून त्यामुळेच पुणे व मुंबईकडे धावणार्या ट्रॅव्हल्सच्या बसेसचे या निर्णयाने नेहमीप्रमाणे चांगभलं झालं आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना नांदेड ते पनवेल एक्सप्रेस सर्वार्थाने सोयीची ठरली होती. त्यामुळेच ही एक्सप्रेस अक्षरशः हाऊसफूल अशी धावत. परंतु, गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागातील झारीतील शुक्राचार्यांनी अर्थपूर्ण अशा खेळ्या करुन पनवेल एक्सप्रेस विशेष गाडी म्हणून विलंबाने सुरु केली. प्रवाशी नाहीत म्हणून ही एक्सप्रेस वारंवार बंद केली. गेल्या काही दिवसांपासून या एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असतांनासुध्दा दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अधिकार्यांनी एक्सप्रेसच रद्द केली. त्यामुळे प्रवाशी वर्गात प्रचंड संताप व्यक्त झाला. रेल्वे विभागाच्या या निर्णयाचा अर्थात खाजगी ट्रॅव्हल्स धारकांना नेहमीप्रमाणे सर्वार्थाने फायदा झाला. या चारही जिल्ह्यातून पुणे, मुंबईस जाणार्या - येणार्या प्रवाशांकडून या ट्रॅव्हल्सधारकांनी तिकीटापोटी हजारो रुपये लाटण्याचा प्रकार खुलेआमपणे सुरु केला आहे. परंतु, या सार्या गोष्टी रेल्वेच्या अधिकार्यांना माहिती असूनसुध्दा ते अर्थपूर्ण असे मौन बाळगून बसले आहेत. त्यामुळेच ट्रॅव्हल्सधारक व रेल्वे विभाग यांच्यातील साटे-लोटे पुन्हा ऐरणीवर आले आहे. प्रवाशी संघटनांनी या विरोधात मोठी बोंब ठोकूनसुध्दा लोकप्रतिनिधी मात्र रेल्वे प्रवाशांबाबत चिडीचूप आहेत. एकाही लोकप्रतिनिधींनी पनवेल एक्सप्रेसबाबत ओळीनेसुध्दा आवाक्षर काढले नाही, हे विशेष.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे विभागाने मागणी नसतांनासुध्दा नंदीग्राम विशेष एक्सप्रेस पुन्हा सुरु केली. त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे कोल्हापूर एक्सप्रेसला आणखीन दोन तासांचा लूज टाईम देवून ट्रॅव्हल्सधारकांचे हितसंबंध जोपासले की काय? असा प्रश्न उभा राहीला आहे.